देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठी शिवरायांनी इच्छा नसताना स्वराज्यासाठी स्वराज्याभिषेक केलाय.
ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण विश्वाची काळजी करणारे पसायदान लिहिले. संत तुकारामांनी समाजाच्या दुटप्पी वागणुकीवर, जातीव्यवस्थेवर, अंधश्रद्धेवर अंकुश ठेवणारे अभंग लिहिले.
हिंदी हिंदू हिंदुत्व च्या पूढे जाणारं महाराष्ट्राचं हिंदुत्व आहे..ह्या भूमीत जसा मराठ्यांचा इतिहास आहे तसंच ही भूमी बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झाली आहे. इथे RSS चा उदय झालाय, त्याच भूमीत डॉ. नरेंद्र दाभोळकर होऊन गेले. इथे प्रबोधनकार ठाकरे पाहिले, संत तुकाराम, आचार्य अत्रे, पुलं देशपांडे पाहिले. संत ज्ञानेश्वरांनी ८०० वर्षांपूर्वी जातीच्या बांधनाना झुगारून अभूतपूर्व सर्व जातीसमावेशक दिंडी काढली. गेल्या ४०० वर्षांचा इतिहास पहा विविधतेने नटलेल्या ह्या भूमीने देशाला अनेक नेते दिलेत ज्यांनी देशाला नवी दिशा दिली.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥
ह्या भगवतगीतेतल्या ओळी महाराष्ट्र जगला आहे.
त्यातलाच नवा चेहरा म्हणजे दलित समाजातून समाजाच्या सर्व जातीच्या बांधनाना झुगारून वर आलेला, जय भीम चा बुलंद नारा देत वर आलेला अभिजित दिपके!! कारण जेव्हा बाकीची राज्य महाराष्ट्रावर कुरघोडी करत महाराष्ट्राचा चावा घेत असतात तेव्हा महाराष्ट्र नेहमीच देशाची काळजी करत असतो. दिल्लीत आदिलशहा असो, निजामशहा, कुतुबशहा, शहेनशहा असो किव्हा आताच हुकूमशहा असो..ह्यासर्वांचे माज एकट्या महाराष्ट्राने उतरवले आहेत.
आज जुलमी हुकूमशाही विरोधात पहिला लढा जिंकलो आहोत. पण ही लढाई आता सुरू झाली आहे. हुकूमशहा हुशार आहे, धूर्त आहे, कपटी आहे. तुम्हाला आयुष्यातून उठवायला पूर्ण तयारी निशी मैदानात उतरला आहे. तो थोडा बेफिकीर झाला म्हणून ही लढाई हरला पण पुन्हा पुढची लढाई तो हरेल अश्या संभ्रमात आपण राहू नये.
आज तो 2 पाऊल मागे आला आहे. ह्या विजयातून प्रेरणा नक्कीच मिळाली आहे. हुकूमशहा विरोधात उभे राहायला अनेकांना बळ मिळाले आहे. पण लढाई संपलेली नाही ती आता कुठे सुरू झाली आहे.
अंधभक्तांना पुन्हा पुन्हा मी हेच सांगेन, भाजपचा वरवंटा देशावर फिरायला सुरुवात झाली आहे. त्यात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा भरडले जाणार ह्यात शंका नाही.
आज E20 पेट्रोल मुळे बेफिकीर सरकार ने केलेला भ्रष्टाचार जसा आमच्या घरी पोहोचला आहे तसाच तो तुमच्या घरी ही पोहोचला आहे. भक्तांना, RSS च्या स्वयंसेवकांना भाजपच्या सर्वार्थाने अर्थहीन राजकारणातून सुट्टी नाही.
त्यामुळे ह्यापुढे आजून भ्रमनिरास होण्याआधी जागे व्हा. पक्ष कुठला ही असो. त्यांना जाब विचारा. व्यक्तिपूजेने आपल्या देशाला इथवर आणून सोडलंय. भाजप जाईल ही उद्या सत्तेतून पण ह्या सरकार ने केलेलं जनतेचं नुकसान भरून काढायला फार फार वेळ लागणार आहे.
आजच्या लढ्याने जय भीम चा नारा पुनर्रीजीवीत केला आहे. ह्या लढ्याने निखिल वागळेंसारख्या अनुभवी पत्रकाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणले. ह्या लढ्याने ठाकरेंना सुद्धा झेंड्याशिवाय, पक्षाशिवाय समर्थन द्यायला भाग पाडले आहे. वागळेंनी सांगितल्याप्रमाणेच जय भीम चा नारा हा काही बौद्ध समाजाचा नारा म्हणून उरलेला नाहीये तो कधीच नव्हता. जय भीम चा नारा हा समतेचा नारा आहे, न्यायाचा नारा आहे, अन्यायाच्या विरोधात लढायछा नारा आहे, सर्वसमावेशकतेचा नारा आहे. ज्याचा उदय महाराष्ट्राच्या मातीत झाला आहे.
आणि म्हणून जो पर्यंत महाराष्ट्र आहे, तो पर्यंत देशाला वाचवायला तो पुढे येतंच राहील.
जय हिंद!! जय महाराष्ट्र!! जय भीम!!
पंकज कानडे